बंगळुरु संघाची उच्च न्यायालयात धाव   

नवी दिल्ली : बंगळुरुत ४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली होती. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष करण्यासाठी ४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात ११ जणांचा दुर्देवी अंत झाला. तर ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. जल्लोषाच्या कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले होते. आता याविरोधात आरसीएसल अर्थात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेडने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
आम्हाला यात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे आरसीएसलचे म्हणणे आहे. आम्ही विजयी जल्लोषाच्या कार्यक्रमासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री ठेवली होती. मात्र त्यासाठी नोंदणीची अट ठेवली होती. आम्हाला यात अडकवले जात आहे, असे आरसीएसलचे म्हणणे आहे.
 
तर दुसर्‍या बाजूला चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क कंपनीनेही त्यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी न्यायलयाचे दार ठोठावले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पर्याप्त पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला, असे डीएनए एंटरटेनमेंट कंपनीचे म्हणणं आहे.

सीआयडीकडून तपास सुरु

चेंगराचेंगरी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. आता सीआयडीकडून या प्रकरणाची तपासणी केली जात आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबी मार्केटींग टीम हेड निखिल सोसाळे न्यायालयीन कोठडीत आहेत. 

Related Articles